Weather Alert राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट सुरू झाली आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. विशेषतः द्राक्ष, आंबा, काजू आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. ऐन काढणीला आलेली पिके डोळ्यादेखत जमिनीवर पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून हवामान विभागाचा अंदाज दुर्दैवाने खरा ठरला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ पिकांचेच नाही, तर अनेक ठिकाणी झाडांवर वीज पडल्याने मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात गारांचा सडा: सांगोला तालुक्यातील द्राक्ष आणि डाळिंब बागा उद्ध्वस्त Weather Alert
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात, विशेषतः जुनोनी आणि जुजारपूर परिसरात गेल्या दोन तासांपासून तुफानी गारपीट सुरू आहे. बीजाच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे द्राक्षांचे मणी फुटले असून डाळिंबाचा मोहोर पूर्णपणे गळून पडला आहे. केशर आंब्याच्या कैऱ्यांचा खच झाडाखाली पडलेला पाहायला मिळत आहे. मळणीसाठी काढून ठेवलेली ज्वारी आणि काढणीला आलेला गहू भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे एका झाडावर वीज पडल्याने ते झाड जळून भस्मसात झाल्याची घटना देखील समोर आली आहे.
लाडकी बहीण योजना ई-केवायसी दुरुस्ती: आज शेवटची संधी Ladki Bahin KYC Date
सातारा आणि नाशिकमध्ये विजेच्या कडकडाटासह गारपीट
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास धुमाळवाडी आणि गिरवी भागात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. साधारण अर्धा तास चाललेल्या या गारपिटीमुळे डाळिंब आणि आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. तिकडे नाशिक जिल्ह्यातही ताहाराबाद आणि सटाणा तालुक्यातील मुल्हेर, अंतापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेला कांदा या पावसामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिकमधील बाजारपेठेत व्यापाऱ्यांची देखील मोठी धावपळ उडाली.
गोंदियात मका पिकाला फटका तर धानाला दिलासा
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातही निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शिरोली आणि महागाव परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक गारपीट झाली. या पावसामुळे मका पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असली तरी, उन्हाळी धान पिकाला मात्र या पावसाचा फायदा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, पिकांच्या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र धोक्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गारांचा पांढरा शुभ्र थर: सोयगाव शहर अवाक
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव शहरात निसर्गाचे एक वेगळेच रौद्र रूप पाहायला मिळाले. दुपारच्या वेळी अचानक ढग दाटून आले आणि सोयगावसह परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव झाला. रस्त्यावर आणि घरांच्या छतावर गारांचा अक्षरशः पांढरा शुभ्र थर साचलेला दिसत होता. मार्च महिन्यात कडाक्याच्या उन्हात अशा प्रकारे गारपीट झाल्याने स्थानिक नागरिक थक्क झाले आहेत. या गारपिटीमुळे वातावरणात तात्पुरता गारवा निर्माण झाला असला तरी, शेतातील पिकांवर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.
फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी: प्रशासनाकडून पंचनाम्यांची अपेक्षा
राज्यातील या अवकाळी संकटामुळे आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. ऐन हंगामाच्या वेळी निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे लाखो रुपयांचे भांडवल मातीमोल झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा शासनाकडच्या मदतीकडे लागल्या आहेत. स्थानिक महसूल विभागाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपला उर्वरित शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.